भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. दोघांच्या नव्या इनिंगसाठी क्रिकेट आणि बॉलिवू़ड वर्तुळासह त्यांच्या चाहत्यांमधून शुभेच्छा वर्षाव सुरु झालाय. वर्षभरात ज्याप्रमाणे कोहली मैदानात धावांचा पाऊस पाडताना दिसला. अगदी त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट-अनुष्का जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट मंडळाने देखील या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआयने ट्विटरवरून विराट कोहलीचे ट्विट शेअर केले आहे. प्रेमळ जोडीला लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तुमचे लग्नानंतरचे आयुष्य आनंदमयी होवो, असा उल्लेख बीसीसीआयने या ट्विटमध्ये केलाय. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीशिवाय बीसीसीआय त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. मात्र, लग्नानंतर एखाद्या खेळाडूला आणि त्याच्या आयुष्याच्या जोडीदाराला शुभेच्छा देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. नुकतेच भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार विवाह बंधनात अडकला. माजी गोलंदाज झहीर खानचेही लग्न झाले. यावेळी बीसीसीआयने कोणतेही ट्विट केल्याचे पाहायला मिळाले नव्हते.

इटलीतील मिलानमध्ये विराट-अनुष्का यांचा विवाहसोहळा मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, विवाह सोहळ्यात त्यांची उपस्थिती दिसली नाही.