अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला आहे. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय. टी-२० मालिका आटोपल्यानंतर कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन वाहिन्या विराटच्या नावाचा वापर करुन जास्तीत जास्त चर्चेत राहता येण्याचा प्रयत्न करत आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या चेहरेपट्टीशी साधर्म्य असलेला एक भारतीय चाहता मैदानात हजर होता. यावेळी कॅमेऱ्याने त्याच्यावर फोकस केला. मैदानावर असलेल्या बिग स्क्रिनवर आपल्यासारखा दिसणाऱ्या एका चाहत्याला पाहून विराट कोहलीही अवाक झाला. पाहा हा व्हिडीओ. Virat Kohli #AUSvIND pic.twitter.com/8PucQIpLP8— Harsh (@perth_169) December 8, 2020 १८७ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विराटने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करत धावांचा ओघ वाढवण्यास सुरुवात केली. ही जोडी भारताचा डाव सावरणार असं वाटत असतानाच स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर संजू सॅमसननेही तिसऱ्या सामन्यात निराशाजनक खेळ करत आपली विकेट फेकली. दुसरीकडे विराटने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सॅमसन माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर सुरेख फटकेबाजी करत विराटने सामन्यात रंगत आणली. यानंतर हार्दिक पांड्यानेही रंगात येत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. परंतू कर्णधार फिंचने आपला हक्काचा फिरकीपटू झॅम्पाला पाचारण केलं, आणि १८ व्या षटकात पांड्याचा बळी घेत झॅम्पानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १९ व्या षटकात अँड्रू टायने विराटला माघारी धाडत भारताच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फिरवलं.