विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडच्या संघाने भारतावर १८ धावांनी मात केली. BCCI नेही भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत क्रिकेट प्रशासकीय समितीचे अधिकारी बैठक घेणार आहेत. पण या दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वाद निर्माण झाल्याच्या आणि संघात दोन गट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु या सर्व चर्चा अत्यंत निरर्थक आहेत असे संघ व्यवस्थापनाच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या सगळ्या चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत. संघात कोणतीही गटबाजी असल्याच्या चर्चा उगाच पेरण्यात आल्या आहेत. विश्वचषक स्पर्धा आता संपली. त्यामुळे सध्या चघळायला विषय नसल्याने कोणीतरी या अफवा पसरवल्या आहेत. स्वतःच्या सोयीनुसार गोष्टींना निराळा रंग दिला जात आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

काय होतं प्रकरण?

भारतीय संघातील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सध्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने या संदर्भातलं वृत्त दिलं होतं. पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे कधीकधी एकमेकांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतात, ज्यामुळे संघात गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यावरुनही असाच गोंधळ निर्माण झाल्याचं खेळाडूने स्पष्ट केलं होतं.

क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. याच कारणामुळे प्रक्षिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी झालेला वाद, आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती. खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या गटातील खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळते. लोकेश राहुलची कामगिरी कितीही खराब असली तरीही त्याचा सलामीवीर, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नेहमी विचार केला जातो. नाहीतर किमान १५ जणांच्या संघात तरी राहुल आपलं स्थान टिकवतोच. आयपीएलमध्ये एकाच संघात खेळत असल्यामुळे युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात असल्याचा आरोपही त्या खेळाडूने केला होता.