भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची गणना सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. विराट कोहलीला कसोटी क्रिकेटचे मूल्य आणि महत्व माहिती आहे. विराट कायम कसोटी क्रिकेटबाबत बोलत असतो. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया कशाप्रकारे प्रगती करू शकते याबाबत तो कायम विचार करत असतो. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या उज्ज्वल कामगिरीच्या बळावरच त्याला क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आदर आणि नावलौकिक मिळाला आहे, असं त्याने सांगितले होते. भारताचा माजी कसोटीपटू राहुल द्रविड याने काही दिवसांपूर्वी विराटवर कसोटी क्रिकेटबद्दल बोलताना स्तुतीसुमने उधळली होती. त्यानंतर आज विराटने एक खास पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कसोटी क्रिकेटसाठी विराट कायम आग्रही असतो. भारतीय क्रिकेटसाठी ही एक दिलासादायक बाब आहे, असे मत अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. त्यानंतर विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले दोन फोटो पोस्ट केले. त्याने दोन्ही फोटो कसोटी क्रिकेटच्या जर्सीमधील निवडले. त्या फोटोंना कॅप्शन देताना, 'पांढऱ्या कपड्यात (कसोटी क्रिकेटमध्ये) खेळताना जी मजा असते, ती इतर कशातच येत नाही. भारतासाठी मला कसोटी क्रिकेट खेळायला मिळालं हे माझ्यासाठी एक वरदानच आहे', असे नमूद केले. View this post on Instagram Nothing comes close to playing an intense game in whites. What a blessing to be able to play test cricket for India. A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on Jun 23, 2020 at 10:52pm PDT दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चपल यांनीही याच मुद्द्यावरून विराटची स्तुती केली होती. “भारत हाच कसोटी क्रिकेटचा तारणहार आहे. ज्यावेळी भारत आशा सोडून देईल, तेव्हा कसोटी क्रिकेट संपेल. केवळ भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीनच देश सध्या नव्याने क्रिकेटमध्ये येणाऱ्या खेळाडूंना कसोटी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. टी २० क्रिकेटला माझा विरोध अजिबातच नाही. झटपट निकाल लागणारे टी २० क्रिकेटचे सामने चाहत्यांना अधिक आकर्षित करतात. त्यामुळे त्याला प्रायोजक आणि इतर आर्थिक सहकार्य सहज मिळतं. कसोटी क्रिकेट मात्र काहीसं वेगळं आहे. कसोटी क्रिकेटसाठी कोणी पटकन प्रायोजकत्व देण्यास तयार होत नाही. चाहतेदेखील अनेकदा त्याकडे पाठ फिरवतात. भविष्यात ही समस्या वाढताना दिसेल. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ‘कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट’ असं म्हणतो म्हणूनच आता भारताकडून आशा आहेत”, असं ते म्हणाले होते.