भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वी खेळाडुंच्या विश्रांतीचा मुद्दा उपस्थित करत बीसीसीआयच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले होते. एकापाठोपाठ मालिका आणि दौरे आयोजित केल्यामुळे खेळाडुंना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो, असे विराटने म्हटले होते. विराटच्या या वक्तव्याला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दुजोरा दिला आहे. तसेच त्याने विराटला काही काळ क्रिकेटपासून दूर राहून विश्रांती घेण्याचा सल्लाही दिलाय. या काळात त्याने भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवावी, असे सेहवागने म्हटले.

विराट कोहलीने खेळाडुंवर सततच्या क्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाविषयी जाहीरपणे वक्तव्य केले, ते योग्यच होते. आगामी काळात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दौऱ्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपवावे. जेणेकरू या काळात कोहलीला आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असतानाही त्याने अशाप्रकारचा ब्रेक घेतला होता. त्यावेळी त्याने संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर दिली होती. तेव्हा भारतीय संघ एकही सामना हरला नव्हता. आतादेखील श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा पराभव होईल, अशी परिस्थिती दिसत नाही. रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमपणे पार पाडेल, असा विश्वास यावेळी सेहवागने व्यक्त केला.

Blog : विराटला खरंच विश्रांतीची गरज

तसेच त्याने कोहलीने उपस्थित केलेल्या मुद्दयाचे समर्थन करताना म्हटले की, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी भारतीय खेळाडुंना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. या ठिकाणी त्यांना दोन सराव सामने खेळायचे आहेत. मात्र, तेव्हा पाऊस पडला तर त्यांना एवढा सरावही मिळणार नाही. त्यामुळे आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला किमान दोन आठवडे मिळाले असते तर त्यांना खेळपट्टीचा योग्य अंदाज घेता आला असता. जेणेकरून त्यादृष्टीने ते सराव करू शकले असते, असे सेहवागने सांगितले.

बीसीसीआयच्या नियोजनावर विराट कोहली संतापला!