भारतीय क्रिकेट संघाच्या आव्हानात आता फारसा दम नाही. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांसाठी आता भारत दौऱ्यावर जाणे अधिक सोपे आहे, असे मत इंग्लंडचा महान फलंदाज जेफ बॉयकॉट यांनी व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट सध्या संक्रमणातून जात आहे, असे ते पुढे म्हणाले.
‘‘काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटकडे सक्षम कसोटी संघ होता. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्यासारखे दिग्गज कसोटी फलंदाज भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावरून निवृत्त झाले आहेत. सचिन तेंडुलकर हा आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवत नाही,’’ असे मत बॉयकॉट यांनी एका वृत्तपत्रामधील स्तंभात व्यक्त केले.
‘‘हरभजन सिंग आणि झहीर खान हे अप्रतिम गोलंदाज आहेत. पण तो इतिहास झाला आहे. आता भारतात जाणे अधिक चांगले झाले आहे. याची आणखी कारणे म्हणजे अधिक चांगल्या प्रतीची हॉटेल्स, इंग्लिश खाद्यपदार्थ आणि शहरांमधील प्रवास फार सोपा झाला आहे,’’ असे बॉयकॉट यांनी सांगितले.