देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. भारतीय संघातले खेळाडू या काळात घरात राहून परिवारासोबत वेळ घालवत आहेत. काही खेळाडू घरातल्या घरात व्यायाम व सराव करण्यावर भर देत आहेत. आयपीएल स्पर्धा पूर्णपणे रद्द केल्यास बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं, यासाठी बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवता येईल का यावर विचार करत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करणारा दिनेश कार्तिकलाही यंदाचं आयपीएल व्हावं असं वाटत आहे. यासाठी त्याने कारणही सांगितलं आहे….

“प्रत्येक पिढीमध्ये एक खेळाडू असा असतो तो संपूर्ण खेळाचा चेहरा-मोहरा बदलतो. माझ्यामते ब्रँडन मॅक्युलमने वर्ल्ड कपमध्ये हे करुन दाखवलं होतं. क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जावं हे त्याने दाखवून दिलं. त्याचं आजुबाजूला असणं तुम्हाला खूप उर्जा देतं. या एका कारणासाठी मला यंदाचं आयपीएल व्हायला हवंय. मला मॅक्युलम आणि मॉर्गन यांच्यासोबत खेळायचं आहे. यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.” दिनेश कार्तिक ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलत होता. दिनेश कार्तिकने आतापर्यंत गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

२९ मार्चला सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी सध्याच्या घडीला भारतात कोणत्याही प्रकारे क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे भारतीय खेळाडू आता मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.