विश्वचषक कायम राखता न आल्याने निराश झालो असलो तरी आता आयपीएल हे एक नवीन आव्हान माझ्यापुढे असेल. त्यामुळे या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यास आम्ही सज्ज आहोत, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. रोहित म्हणाला की, ‘‘ विश्वचषक कायम न राखता आल्याने निराश असलो तरी सध्याच्या घडीला मी आयपीएलवर लक्ष केंद्रित केले आहे. एक नवीन आव्हान माझ्यापुढे आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला आयपीएलच्या जेतेपदाचा विचार करत आहोत.’’
रोहितने दोन द्विशतके लगावली आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येही त्याने बराच वेळ भारतीय संघाबरोबर व्यतीत केला होता, पण आता दोन महिने चालणाऱ्या आयपीएलसाठी सज्ज असल्याचे रोहितने सांगितले. तो म्हणाला की, ‘‘आयपीएलसाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. आयपीएलचा कार्यक्रम बऱ्याच दिवसांपूर्वी बनवण्यात आला होता, त्यामुळे स्पर्धेची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे या स्पर्धेसाठी आमची मानसिकता तयार झाली आहे. माझ्या मते या वेळी कोणीही मानसिकरीत्या शिणलेला नसेल. माझ्या मते आयपीएल हे एक चांगले व्यासपीठ आहे, ज्याचा फायदा प्रत्येक जणाने उचलायला हवा.’’