दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत सपशेल शरणागती पत्करल्यानंतर भारतीय संघाला आता किमान तिसरा एकदिवसीय सामना आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी तरी जिंकावा लागेल. भारतीय संघाचा सलामीवीर रोहीत शर्माने मात्र, फलंदाजांच्या तांत्रिक गोष्टीत कमतरता भासल्याच्या मुद्द्याला नाकारत आमच्या फलंदाजीचे तंत्र नाही, संघाला चांगल्या भागीदारीची कमतरता भासली असल्याचे म्हटले.
रोहीत म्हणाला, “दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही असेही म्हणता येणार नाही कारण, दुसऱया सामन्यातील परिस्थिती मला तरी भारतीय स्टेडियमवर असते तशीच जाणवली परंत, आम्ही दक्षिण आफ्रिकेत खेळत आहोत. याचे भान ठेवणे गरजेचे आहे. फलंदाजीच्या बाबतीत तांत्रिक चुका किंवा कमतरता भासली असे मला वाटत नाही. दोन्ही सामन्यात उत्तम भागीदारीची गरज होती ती आमच्याकडून होऊ शकली नाही.
सामन्यात एकतरी शंभर आणि दोन पन्नास धावांच्या भागीदारी होणे गरजेचे होते. परंतु, तिसरा सामन्यात आम्ही नक्की भागीदारीवर भर देऊ भारतीय फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी करण्याची उत्कृष्ट क्षमता आहे. यात काही शंका नाही परंतु, याआधीच्या सामन्यांसारख्या फलंदाजी भागीदाऱया दक्षिण आफ्रिकेत झाल्या नाहीत म्हणून आमचा पराभव झाला” असेही रोहीत म्हणाला.
आफ्रिकेतील उसळी घेणाऱया खेळपट्टीची भारतीय फलंदाजांना आधीपासूनच माहिती होती. त्यानुसार सरावही सुरू होता आणि आहे. परंतु, फलंदाजांच्या चांगल्या भागीदाऱया होणे अपेक्षित आहे. तिसऱया सामन्यात नक्कीच आम्ही पुनरागम करू असेही तो पुढे म्हणाला.