आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या खेळाडूंची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयतर्फे रवी सवानी यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतरच दोषी खेळाडूंवर कारवाई करण्यात येईल, असं बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन म्हणाले. आज (रविवार) चेन्नई येथे पार पडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तातडीच्या बैठकीमध्ये अटक करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंवर कारवाईसंदर्भातील रुपरेषा एन. श्रीनिवासन यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली. या बैठकीला बीसीसीआयचे २८ पदाधिकारी उपस्थित होते.
बीसीसीआयचे सट्टेबाजांच्या कारवायांवर नियंत्रण नाही. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आम्ही दिल्ली पोलिसांकडून माहिती मागवली असल्याचं, श्रीनिवासन म्हणाले.   
बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख रवी सवानी हेसुद्धा या बैठकीला हजर होते आणि त्यांची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट क्षेत्राला हादरविले असले तरी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच दोषी खेळाडूंवर कारवाई करण्यात येईल असं श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.
भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता नसून बीसीसीआय कोणत्याही प्रकारच्य सज्जेबाजाला प्रोत्साहन देत नाही. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी खेळाडूंवर कारवाई करण्यास बीसीसीआय हयगय करणार नाही. आणखी काही खेळाडू या प्रकरणात अडकल्याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, असं श्रीनिवासन म्हणाले. या प्रकरणी अटक झालेल्या तीन खेळाडूंच्या विरोधात राजस्थान रॉयल गुन्हा दाखल करणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.