भारताविरुद्धची कोलकाता कसोटी अनिर्णित राखण्यात श्रीलंकेच्या संघाला यश आलं. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर खिंड लढवत श्रीलंकेने पराभवाची नामुष्की टाळली. कोलकाता कसोटीचे पहिले दोन दिवस हे पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे वाया गेले होते. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहील असा अंदाज सर्वांना वर्तवला होता. मात्र, दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीचं शतक, डाव घोषित करण्यासाठी साधलेली वेळ आणि भुवनेश्वर कुमारने केलेला टिच्चून मारा यामुळे अखेरच्या दिवशी कसोटीत अचानक रंगत आली. सामना जिंकण्यासाठी अवघ्या ३ विकेटची आवश्यकता असताना अंधुक प्रकाशाने खोडा घातला आणि दोन्ही पंचांनी खेळाडूंच्या सहमतीने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताचा सलामीवीर लोकेश राहुलच्या मते अखेरच्या दिवशी आणखी ५-६ षटकांचा खेळ झाला असता तर भारतीय संघाने सामन्यात नक्कीच बाजी मारली असती.

अवश्य वाचा – भुवनेश्वर कुमार, शिखर धवनला विश्रांती; तामिळनाडूच्या विजय शंकरला संघात स्थान

२३१ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाची दुसऱ्या डावात अक्षरश: दाणादाण उडाली. भुवनेश्वर कुमारने ४ फलंदाजांना माघारी धाडत लंकेच्या आक्रमणातली हवाच काढून टाकली. “हा सामना आमच्यासाठी चांगला अनुभव देणारा ठरला. अखेरच्या दिवशी आम्हाला शेवटच्या सत्रात ५-६ षटकं टाकण्याची संधी मिळाली असती, तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो. सामन्याचे दोन दिवस पावसाने वाया गेल्यानंतरही अखेरच्या दिवशी सामना रंगतदार अवस्थेत पोहचणार असेल तर भविष्यकाळात असे सामने वारंवार होवोत, असे लोकेश राहुलने सांगितले.

अवश्य वाचा – कोलकाता कसोटीच्या अखेरच्या दिवशी विराट कोहलीच्या नावावर या ‘५’ विक्रमांची नोंद

पहिल्या डावात भारतीय संघ श्रीलंकेच्या आक्रमणासमोर पुरता कोलमडला होता. मात्र, पावसामुळे खेळपट्टीचा लाभ उचलण्यात लंकेचा संघ यशस्वी झाल्याचं राहुलचं म्हणणं आहे. जर श्रीलंकेऐवजी भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असती तरीही तुम्हाला अशाच स्वरुपाचं चित्र पहायला मिळालं असतं. पहिल्या दोन दिवसात खेळपट्टीवर चेंडू चांगले वळत होते. त्याचा फायदा घेत सुरंगा लकमलने सुरेख गोलंदाजी करत आम्हाला चकीत केलं. मात्र, त्यानंतरही भारतीय संघाने आव्हानात्मक धावसंख्या गाठल्याने आम्ही सामन्यात पुनरागमन करु शकलो असं लोकेश राहुल म्हणाला.

अवश्य वाचा – कोलकाता कसोटीत पाऊस आणि अंधुक प्रकाशाचा व्यत्यय, तरीही पुजाराकडून ५ दिवस फलंदाजी