‘सध्याच्या भारतीय संघाकडे सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची फळी आहे. पण फलंदाजांनी आपली जबाबदारी समजून चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी समजायला हवी. प्रत्येकाने आपली सर्वोत्तम कामगिरी करायला हवा. खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणेला वाव आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी ओळखून खेळ केल्यास सामनाच नाही, तर मालिकाही जिंकू असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुंबई येथे पत्रकार परिषद झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन टी२०, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

यावेळी विराट कोहली म्हणाला की, ‘संघातील खेळाडूंच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. खेळाडू कसे तंदुरूस्त राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आम्ही सज्ज आहोत. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या चुका या दौऱ्यात होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. ‘

‘इंग्लंड दौऱ्यातून भारतीय संघाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करेल, असे रवी शास्त्री म्हणाले.’