न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात थोडक्यात विजय हुकला असला तरी, या सामन्यातून भारतीय संघाला भरपूर आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली आहे.
पहिला कसोटी सामना तिसऱया दिवशी आमच्या बाजूने होता. न्यूझीलंडच्या आव्हानाचा योग्यरित्या पाठलागही सुरू होता. परंतु, अजिंक्य रहाणे आणि रोहीत शर्मा बाद झाल्यानंतर संघावर दबाव वाढला होता. त्यामुळे या सामन्याबद्दल माझ्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आम्ही सामना जरी हरलो असलो तरी, या सामन्यातून आम्हाला भरपूर आत्मविश्वास मिळाला असल्याचे धोनी म्हणाला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विदेश दौऱयावर झालेल्या ११ कसोटी मालिकांमध्ये भारताने १० कसोटी मालिका गमावल्या आहेत. यावरून विदेश दौऱयावरील कसोटी मालिकेंसाठीचा अयशस्वी कर्णधार म्हणून ओळख निर्माण होण्याची नामुष्की धोनीवर आली आहे.