India vs West indies 1st T20 : विंडीजविरुद्धचा पहिला टी२० सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. विंडीजने २० षटकात ८ बाद १०९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांची धावपळ झाली. पण दिनेश कार्तिक आणि कृणाल पांड्या या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने ३४ चेंडूत नाबाद ३१ तर कृणाल पांड्याने ९ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. मात्र ३ बळी टिपणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीर जाहीर करण्यात आले. त्याआधी सामन्यात विंडीजने २० षटकात ८ बाद १०९ धावा केल्या आणि भारताला ११० धावांचे माफक आव्हान दिले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांनी विंडीजच्या अनुभवी संघाला १०९ धावांत रोखले. कुलदीप यादवने सर्वाधिक ३ बळी टिपले, तर कृणाल पांड्या आणि खलील अहमदने आपल्या टी२० कारकिर्दीतील बळीचे खाते उघडले. विंडीजकडून फॅबियन अॅलनने सर्वाधिक २७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघे झटपट बाद झाले. पाठोपाठ ऋषभ पंतदेखील तंबूत परतला. त्यानंतर दिनेश कार्तिकने मनीष पांडेच्या साथीने ३८ धावांची भागीदारी केली. मनीष पांडे बाद झाल्यावर आलेल्या कृणाल पांड्याने ९ चेंडूत २१ धावा करून सामना खिशात घातला. कार्तिकही ३१ धावांवर नाबाद राहिला.