अखेरच्या सत्रात कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ३०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. कोहली व रहाणे यांनी खेळाची गती कमी करत एक-एक धाव घेण्याकडे भर दिला. या खेळीदरम्यान कर्णधार विराट कोहलीने आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र दुसऱ्या बाजूने अजिंक्य रहाणेला ही किमया साधता आली नाही. ४१ धावांवर खेळत असताना अजिंक्य रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी संघाची फार पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३६४ धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी राजकोट कसोटीच्या दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं. चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉ या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडण्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना यश आलं. लुईसने पुजाराचा अडसर दूर केला तर देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ सोपा झेल देऊन माघारी परतला. पृथ्वीने १५४ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १९ सुरेख चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने चेतेश्वर पुजारानेही ८६ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. दरम्यान मुंबईच्या पृथ्वी शॉने पहिल्याच कसोटी सामन्यात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत असताना पृथ्वी शॉने शतक झळकावलं आहे. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ भारताचा पंधरावा खेळाडू ठरला आहे. पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी रचत वेस्ट इंडिजला सामन्यात बॅकफूटला ढकललं. याचसोबत दुसऱ्या विकेटसाठी पुजाराने शॉच्या साथीने द्विशतकी भागीदारीही केली. त्याआधी, दोन्ही फलंदाजांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीच्या पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व राखलं . पहिल्या सत्राअखेरीस भारताने एका गड्याच्या मोबदल्यात १३३ धावांपर्यंत मजल मारली . सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणाच्या कसोटीत झळकावलेलं अर्धशतक हे पहिल्या सत्राततल्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं.