भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ पुरता कोलमडला आहे. विंडिजचा निम्मा संघ शंभरीच्या आतच माघारी परतला आहे. मोहम्मद शमीने सलामीच्या दोन्ही फलंदाजाना माघारी धाडत विंडिजला धक्के दिले. यानंतर रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा यांनी १-१ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला आणखी एक धक्का दिला. अखेर रोस्टन चेस आणि किमो पॉल यांनी अखेरची काही षटकं खेळून काढत संघाची पडझड थांबवली. दुसऱ्या दिवसाअखेरीस वेस्ट इंडिजने ६ गड्यांच्या मोबदल्यात ९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्याआधी अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ६४९ धावांपर्यंत मजल मारली आहे. रविंद्र जाडेजाने तळातल्या फलंदाजांना सोबतीला कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक साजरं केलं. जाडेजाने शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. जाडेजाने नाबाद १०० धावांच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकार लगावले आहेत. त्याआधी पहिल्या सत्रात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीची नोंद केली. ऋषभ पंतच्या साथीने संघाचा किल्ला लढवत विराटने आपल्या कारकिर्दीतलं २४ वं शतक झळकावलं. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतनेही आक्रमक फटकेबाजी करत विराटला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत पंतने काही चांगले फटके खेळले. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत आपलं शतक साजरं करेलं असं वाटत असतानाच देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला. अखेर उपहारानंतर विराट कोहलीला माघारी धाडण्यात वेस्ट इंडिजला यश आलं. लुईसच्या गोलंदाजीवर देवेंद्र बिशुने कोहलीचा झेल घेतला. कोहलीने २३० चेंडूत १३९ धावांची खेळी केली, त्याच्या या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र दुसऱ्या बाजूने जाडेजाने किल्ला लढवत ठेऊन आपलं पहिलं वहिलं शतक साजरं केलं. वेस्ट इंडिजकडून देवेंद्र बिशुने ४ तर शेरॉन लुईसने २ बळी घेतले.