वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत पाहुण्या विंडीज संघावर डावाने मात करत मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने १ डाव आणि २७२ धावांची सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांमध्ये आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात कुलदीप यादवने ५, रविंद्र जाडेजाने ३ तर रविचंद्रन आश्विन २ विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना १२ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे. पहिला डाव १८१ धावांमध्ये आटोपल्यानंतर फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या विंडिजच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली, मात्र रविचंद्रन आश्विनने क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत विंडिजला पहिला धक्का दिला. तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत विंडिजने एका गड्याच्या मोबदल्यात ३३ धावांपर्यंत मजल मारली, मात्र उपहारानंतर विंडिजचा डाव पुन्हा एकदा गडगडला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विंडिजचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. कायरन पॉवेल आणि शाई होप यांच्यात झालेली ४७ धावांची भागीदारी आणि मधल्या फळीत रोस्टन चेसने पॉवेलला दिलेली साथ या जोरावर वेस्ट इंडिजचे १५० धावांचा टप्पा ओलांडला. पॉवेलने भारतीय फिरकीपटूंवर चांगला हल्लाबोल करत अर्धशतक झळकावलं. मात्र ८३ धावांवर त्याला कुलदीपच्या गोलंदाजीवर माघारी परतावं लागलं. यानंतर विंडीजचे उरलेले सर्व फलंदाज हे हजेरीवीर ठरले. त्याआधी फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या भेदक माऱ्यासमोर पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १८१ धावांमध्ये कोलमडला. पहिल्या दिवसात ६ गड्यांच्या मोबदल्यात ९४ धावांपर्यंत मजल मारणारा वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाही फारशी मजल मारु शकला नाही. काही फलंदाजांनी धावा जमवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने एकाकी झुंज देत ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवशीच्या खेळातील पहिल्या सत्रात आश्विनने वेस्ट इंडिजच्या शेपटाला फारशी वळवळ करण्याची संधीच दिली नाही. एकामागोमाग एक बळी जाण्याचं सत्र सुरुच राहिल्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ १८१ धावांमध्ये कोलमडला. पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, मोहम्मद शमीने २ तर उमेश यादव, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला. विंडिजचा एक फलंदाज धावबाद झाला.