IND vs WI : भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने भारताला बरोबरीत रोखले. शाय होपचे झुंजार शतक आणि हेटमायरची तडाखेबाज ९४ धावांची खेळी याच्या बळावर विंडीजने हा सामना बरोबरीत सोडवला. भारताने दिलेल्या ३२२ धावांचे आव्हान विंडीज पूर्ण करू शकले नाही, पण ३२१ धावा करत हा सामना बरोबरीत सोडवण्यात विंडीजला यश आले. या सामन्यातील बरोबरीमुळे भारत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ३२१ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीचे नाबाद दीडशतक (१५७*) आणि अंबाती रायडूच्या ७३ धावांच्या बळावर भारताने ही धावसंख्या उभारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन (२९) आणि रोहित शर्मा (४) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर विराट आणि रायडू यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. पण रायडू फटकेबाजी करताना ७३ धावांवर बाद झाला. त्याने ८ चौकार लगावले. त्यानंतर धोनी (२०), पंत (१७) आणि जाडेजा (१३) हे तिघे फार काळ तग धरू शकले नाहीत. पण सर्व खेळाडूंबरोबर छोट्या छोट्या भागीदारी करून कोहलीने भारताला ३२१ धावांपर्यंत पोहचवले. विंडीजकडून नर्स आणि मॅकॉयने २-२ तर रोच आणि सॅम्युअल्सने १-१ गडी बाद केला. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. पण हेटमायरने जोरदार फटकेबाजी करत विंडीजच्या आशा पल्लवित केल्या. त्याने ९४ धावा केल्या. पण शतक लागण्याआधीच तो ९४ धावांवर बाद झाला. त्यानंतर विंडीजच्या विजयाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत शाय होपने अप्रतिम खेळी केली. या सामन्यात त्याने झुंजार शतक ठोकले. शतक ठोकल्यानंतही त्याने आपला खेळ योग्य पद्धतीने सुरूच ठेवला आणि विंडीजला पराभवाच्या छायेतून वाचवले. मात्र शेवटच्या चेंडूवर ५ धावा असताना त्याला षटकार लगावता आला नाही. पण चौकार लगावत त्याने भारताच्या ३२१ धावांच्या कामगिरीशी बरोबरी साधली. होपने १३४ चेंडूत १२३ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने ३ तर शमी, उमेश यादव आणि चहल यांनी १-१ गडी बाद केला.