सलामीवीर लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर विंडीजने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर मात केली आहे. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. सिमन्सने या सामन्यात ६७ धावा केल्या. त्याला एविन लुईस, शेमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांनी चांगली साथ दिली सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाने काही चांगल्या संधी दवडल्या. याचा फायदा घेत विंडीजच्या फलंदाजांनी मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. एविन लुईस आणि हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेतला. त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. नाणेफेक जिंकत विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. विंडीजकडून हेडन वॉल्श आणि केजरिक विल्यमस यांनी प्रत्येकी २-२ तर पेरी, शेल्डन कोट्रेल आणि जेसन होल्डरने १-१ बळी घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवातही अडखळत झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना मोठे फटके खेळताना त्रास होत होता. अखेरीस लोकेश राहुलला माघारी धाडत वॉल्शने भारताला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने रोहित शर्माही माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने कर्णधार विराट कोहली सोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान शिवमने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले अखेरीस ७ गड्यांच्या मोबदल्यात भारताने १७० धावांपर्यंत मजल मारली.