गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली आहे. या विजयासह ३ टी-२० सामन्यांची मालिकाही भारतीय संघाने २-१ ने जिंकली. विजयासाठी दिलेलं २४१ धावांचं आव्हान विंडीजला पेलवलं नाही. पाहुण्या संघाचे फलंदाज १७३ धावांपर्यंतच मजल मारु शकले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. अवश्य वाचा - IND vs WI : रोहित शर्मा @ 400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवातही खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. हे फलंदाज विंडीजचा डाव सावरणार असं वाटत असतानाच, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. मात्र यानंतरही कायरन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत पोलार्डने उत्तुंग षटकार ठोकले. मात्र ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. यानंतरची भारतीय गोलंदाजांनी आपली उरली-सुरली जबाबदारी पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, सलामीवीर रोहित शर्मा-लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. ३ गड्यांच्या मोबदल्यात भारताने २४० धावा केल्या. विंडीजच्या सर्व गोलंदाजांना आज भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीचा सामना करावा लागला. भारताकडून लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या. विंडीजकडून कोट्रेल, विल्यम्स आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. विंडीजविरुद्ध भारताची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. अवश्य वाचा - IND vs WI : घरच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची फटकेबाजी, शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत विंडीजच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी १३५ धावा जोडल्या. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. रोहित शर्मा ७१ धावांवर माघारी परतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने विराट कोहली ऐवजी ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. अवश्य वाचा - IND vs WI : ऋषभ पंतची हाराकिरी सुरुच, टी-२० क्रिकेटमध्ये लाजिरवाणा विक्रम नावावर मात्र पंतने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. पोलार्डच्या गोलंदाजीवर पंत भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराटने आक्रमक फटकेबाजी करत विंडीजच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. राहुल ९१ धावा काढून अखेरच्या षटकात माघारी परतला. अवश्य वाचा - IND vs WI : वानखेडे मैदानावर ‘किंग कोहली’ चमकला, विंडीज गोलंदाजांची केली धुलाई