शेमरॉन हेटमायर आणि शाई होपने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने वन-डे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नई वन-डे सामन्यात भारताने विजयासाठी दिलेलं २८८ धावांचं आव्हान यशस्वीरित्या पार पाडत विंडीजने ८ गडी राखून सामना जिंकला आहे. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. शेमरॉन हेटमायरने १३९ तर शाई होपने नाबाद १०२ धावा केल्या. ४८ व्या षटकातच विंडीज फलंदाजांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अवश्य वाचा - IND vs WI : हेटमायरच्या फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाज निष्रभ, मैदानाच्या चौफर फटकेबाजी भारताप्रमाणे विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. मात्र यानंतर हेटमायर आणि होप जोडीने नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत मैदानावर आपला जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत दोन्ही विंडीज फलंदाजांनी भारताकडून विजय हिसकावून घेतला. टी-२० मालिकेप्रमाणे पहिल्या वन-डे सामन्यातही भारताचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी फारशी प्रभावी वाटली नाही. दीपक चहर आणि मोहम्मद शमीने भारताकडून १-१ बळी घेतला. अवश्य वाचा - Video : थेट मैदानाबाहेर, हेटमायरच्या फटकेबाजीसमोर विराट कोहलीही हतबल त्याआधी, श्रेयस अय्यर-ऋषभ पंत आणि अखेरच्या षटकांत रविंद्र जाडेजा आणि केदार जाधवने केलेल्या महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात २८७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेल्डन कोट्रेलने आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताला दोन दणके दिले. मात्र यानंतर भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत संघाचा डाव सावरला. भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. सुरुवातीच्या षटकांमध्ये राहुल आणि रोहित शर्मा या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळताना अडचण होत होती. अखेरीस कोट्रेलने सातव्या षटकात राहुल आणि विराटला माघारी धाडत भारताला धक्के दिले. यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित शर्माही ३६ धावा काढून अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या तरुण खेळाडूंनी सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला. चौथ्या विकेटसाठी पंत आणि अय्यरने ११४ धावा जोडल्या. पंत ७१ तर श्रेयस अय्यर ७० धावांवर माघारी परतला. यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत धावांचा ओघ सुरुच ठेवला. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या तळातल्या फळीतील फलंदाजांनी संघाला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कोट्रेल, किमो पॉल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी २-२ तर कायरन पोलार्ड यांनी १ बळी घेतला.