कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली आहे. विंडीजने विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केलं. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर मालिका विजयाने करत आगमी वर्षासाठी भारतीय संघ असाच फॉर्म कायम राखण्यासाठी नव्याने सुरुवात करेल यात शंका नाही. भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे. विंडीजने विजयासाठी दिलेल्या दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकं झळकावत पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन होल्डरने रोहित शर्माला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर ठराविक अंतराने लोकेश राहुलही माघारी परतला. राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. श्रेयस अय्यर, केदार जाध आणि ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतल्यामुळे भारतीय गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. मात्र यानंतर विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना विराट त्रिफळाचीत झाला. ८५ धावांवर किमो पॉलने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर रविंद्र जाडेजाने मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या साथीने उरलेल्या धावा पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विंडीजकडून किमो पॉलने ३ तर शेल्डन कॉट्रेल, अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्याआधी, निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, वेस्ट इंडिजने अखरेच्या वन-डे सामन्यात ३१५ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. निकोलस पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७४ धावा केल्या. कटकच्या मैदानावर फलंदाज धावांची बरसात करतील असा अंदाज होता, मात्र विंडीजच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. शाई होप आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. मात्र यासाठी त्यांनी बरेच चेंडू खर्च केले. रविंद्र जाडेजाने विंडीजची जोडी फोडली. यानंतर रोस्टन चेस, हेटमायर आणि होप यांनी फटकेबाजी करत विंडीजचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनीने हेटमायर आणि चेसला तर शमीने होपला माघारी धाडत विंडीजला धक्का दिला. यानंतर पूरन जोडीने अखेरच्या षटकांमध्ये सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या बाजूने त्याला कर्णधार पोलार्डनेही उत्तम साथ दिली. अखेरच्या टप्प्यात भारतीय गोलंदाज विंडीजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवू शकले नाहीत. भारताकडून पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने २ तर रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने १-१ बळी घेतला.