भारतीय संघाने शुक्रवारी वेस्ट इंडिजला हरवल्यामुळे तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी गाठण्याची चुरस अधिक वाढली आहे. रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ उत्सुक आहे.
सध्या कॅरेबियन संघ नऊ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे, तर श्रीलंका आणि भारताच्या खात्यावर प्रत्येकी पाच गुण जमा आहेत. श्रीलंकेचे दोन सामने तर भारत आणि विंडीजचा प्रत्येकी एकेक सामना शिल्लक आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात विंडीजने १०२ धावांनी पराभव पत्करला. त्यात फक्त जॉन्सन चार्ल्सने एकाकी झुंज देत ३९ चेंडूंत ४५ धावा केल्या.