सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ मर्यादीत षटकांच्या सामन्यांची मालिका खेळतो आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या मालिकेत खेळत असलेल्या बहुतांश खेळाडूंची विश्वचषकाच्या संघात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताचा कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची विश्वचषक संघात वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळत असताना अजिंक्यने याबद्दल नाराजी बोलून दाखवली. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन जो निर्णय घेईल त्याचा मला आदर आहे, मात्र माझ्या कामगिरीची दखल घ्यायला हवी असं अजिंक्य रहाणे म्हणाला.

“एक फलंदाज म्हणून मी आक्रमक आहे, मात्र तो माझा स्वभाव नाही. बोलून दाखवण्यापेक्षा मी धावा काढून आपली बाजू मांडण्याला जास्त महत्व देतो. मी आतापर्यंत प्रत्येक वेळी संघाचा विचार पहिला केला आहे, यापुढेही करत राहीन. मात्र सरतेशेवटी तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाणं महत्वाचं असतं.” अजिंक्यने आपली बाजू मांडली. याचवेळी अजिंक्यने आपल्याला वन-डे संघात सातत्याने संधी मिळाली नसल्याचंही म्हटलं.

“मला आतापर्यंत संघात सातत्याने संधी मिळाली नाही. ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी मी चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे किमान मी इतकी मागणी करुच शकतो”, अजिंक्य बोलत होता. २०१७ साली विंडीज दौऱ्यात अजिंक्यला मालिकावीराचा किताब मिळाला होता. “गेल्या ३-४ मालिकांमध्ये मी ४५ ते ५० च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. ज्या क्षणी मला संघातून डावलण्यात आलं त्यावेळी मी स्थानिक क्रिकेटकडे वळलो आणि तिकडेही मी चांगली कामगिरी केली. विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मध्यंतरी निवड समिती माझ्या नावाचा विश्वचषकासाठी विचार करतंय असं ऐकण्यात आलं होतं. तसं होत असेल तर चांगलंच आहे. मी अजुनही आशा सोडली नाही.” अजिंक्यने आपली नाराजी बोलून दाखवली.