काही माजी क्रिकेटपटू स्वप्नवत संघ जाहीर करून प्रकाशझोतात येण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण कधीही स्वप्नवत संघ निवडण्याच्या फंद्यात पडणार नाही, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे.
आपली बाजू मांडताना धोनी म्हणाला की, ‘‘देशासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आपण मान ठेवायला हवा. प्रत्येक खेळाडू आणि त्यांचा संघ कोणत्या जमान्यातला आहे, त्यानुसार त्यांची तुलना करता येणार नाही किंवा त्यांचा संग्रहही करता येणार नाही. त्यामुळेच स्वप्नवत संघ निवडण्याचा फंद्यात मी पडणार नसून भारतासाठी खेळलेल्या प्रत्येक खेळाडूचा मला अभिमान आहे.’’
 कपिल देव आणि सौरव गांगुली या दोन्ही भारताच्या माजी कर्णधारांनी काही दिवसांपूर्वी भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कपिल यांच्या सर्वोत्तम एकदिवसीय संघात १९८३च्या विश्वविजेत्या संघातील एकही खेळाडू नव्हता.

‘‘निवडीसाठी वय हा मुद्दा नाही, तर फॉर्म आणि फिटनेस महत्त्वाचा असतो. एका प्रकारातील कामगिरीचा परिणाम दुसऱ्या प्रकाराच्या कामगिरीवर होत असतो. विराट कोहली हा गुणी क्रिकेटपटू आहे. त्याला खेळाची चांगली माहिती असून कर्णधार म्हणूनही त्याने चांगली कामगिरी केली आहे.’’
-महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार