कोलकाता : दोन समांतर संघटना स्थापन केल्याबद्दल भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघातर्फे गुरुवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या महिन्याअखेपर्यंत सर्व काही सुरळीत करण्याचे निर्देश महासंघाकडून देण्यात आले आहेत.

सोमवारपासून बंदीचा निर्णय लागू होणार असून १९ ते २५ ऑगस्टदरम्यान माद्रिद येथे होणाऱ्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना देशाच्या तिरंग्याखाली खेळता येणार आहे. ‘‘जागतिक तिरंदाजी महासंघाने जून महिन्यातच भारतीय तिरंदाजी संघटनेवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता,’’ असे महासंघाचे महासचिव टॉन डायलीन यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

जागतिक महासंघाच्या कार्यकारी मंडळाने भारतीय संघटनेला जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. पण आतापर्यंत कोणतीही पावले उचलली न गेल्याने महासंघाने अखेर निलंबनाची निर्णय घेतला. ‘‘ऑगस्ट महिन्यापर्यंत समाधानकारक तोडगा न काढल्यास, आशियाई अजिंक्यपद आणि आशियाई पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांच्या सहभागाबाबत कार्यकारी मंडळ अंतिम निर्णय घेऊ शकते,’’ असेही डायलीन यांनी सांगितले.

याप्रकरणी न्यायालयाचा निकाल येणे अपेक्षित असल्यामुळे भारतीय संघटनेने जागतिक महासंघाकडे काही दिवसांची मुदत मागितली होती, मात्र ती फेटाळण्यात आली आहे. न्यायालयात सुनावणी होण्याच्या एक दिवसआधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्थान मिळवता येणार आहे. आतापर्यंत तीन भारतीय पुरुष खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले असले तरी एकाही महिला खेळाडूला टोक्यो ऑलिम्पिकसाठी जागा मिळवता आलेली नाही.

भारतीय तिरंदाजी संघटनेच्या ९ जून रोजी एकाच वेळी नवी दिल्ली आणि चंडीगढ येथे दोन निवडणुका घेण्यात आल्या. संघटनेने अर्जुन मुंडा आणि बीव्हीपी राव या दोन अध्यक्षांची नियुक्ती केली असून मुंडा यांना २० राज्य संघटनांचा तर राव यांना १० संघटनांचा पाठिंबा आहे. जागतिक महासंघाने या निवडणुकीसाठी काझी रजिब उद्दिन अहमद चापोल यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. पण दोन्ही गटांना एकत्र घेऊन निवडणुकांचा तोगडा काढण्यात ते असमर्थ ठरले. आता आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (साइ) निवड चाचणी होणार असून त्यानंतर शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात येईल.