भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला. ते श्रीलंकेतील न्यूज फर्स्ट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले. श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने, २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार असलेला कुमार संगकारा या दोघांनी हे आरोप फेटाळून लावले. सामन्यात शेवटच्या क्षणाला संघात मुद्दाम बदल करण्यात आले, असाही दावा माजी क्रीडामंत्र्यांनी केला होता. त्यानंतर आता माजी कर्णधार आणि तत्कालीन श्रीलंका संघाचे मुख्य निवडकर्ते अरविंदा डि सिल्वा यांनी या प्रकरणी मत व्यक्त केले.

पैचान कौन…? महिला वेषातील ‘हे’ १४ क्रिकेटपटू ओळखून दाखवाच…

“काही लोक खळबळजनक दावा करतात आणि धडधडीत खोटं बोलतात. पण प्रत्येक वेळी आपण त्यांना असंच खोटं बोलून देऊ शकत नाही. म्हणूनच मला असं वाटतं की ICC, BCCI आणि SLC तिघांनीही सरळ हा सामना फिक्स होता का? याचा तपास करावा. सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज आपल्या समृद्ध कारकिर्दीत एक विश्वचषक जिंकला. त्याच विजेतेपदावर अशा प्रकारे प्रश्न उपस्थित केल्याने त्याच्या प्रतिमेला देखील तडा जाऊ शकतो. त्यामुळे किमान सचिन आणि त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी तरी भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करावी आणि तपासाला सुरुवात करावी, म्हणजे सत्य समोर येईल आणि खेळाला गालबोट लागणार नाही”, असे डि सिल्वा म्हणाले.

अरविंदा डि सिल्वा

“२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही, पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा जो संघ खेळला तो मुळात आम्ही निवडलेला संघच नव्हता. शेवटच्या क्षणाला क्रीडामंत्री या नात्याने मी किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा न करता ४ नवीन खेळाडूंना संघात जागा देण्यात आली. लंकन क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही याबद्दल अंधारात ठेवण्यात आलं”, असा आरोप वृत्तवाहिनीशी बोलताना अलुथगमगे यांनी केला.