इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आज बांगलादेशविरोधात मैदानात उतरणार आहे. यावेळी भारतीय संघात दोन मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. आज भारत बांगलादेशविरोधात विश्चचषक स्पर्धेतील आठवा सामना खेळणार आहे. भारताने आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. गुणतालिकेत भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत उर्वरित दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेतील आपली जागा अबाधित ठेवण्याचा विराट सेनेचा प्रयत्न असेल. दरम्यान बांगलादेशविरोधात मैदानात उतरताना भारतीय संघात दोन मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

गेल्या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. दरम्यान दुखापतीमुळे विजय शंकर विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्यात केदार जाधव आणि कुलदीप यादव यांना विश्रांती दिली जाऊ शकते. केदार जाधवच्या जागी दिनेश कार्तिकला संधी दिली जाऊ शकते. तर कुलदीपच्या जागी भुवनेश्वरला संधी देत भारतीय संघ मैदानात उतरु शकतो.

या खेळांडूंवर असेल नजर –

बांगलादेश आणि भारतीय संघादरम्यान होणाऱ्या सामन्यात गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास शमी आणि बुमराह यांच्यावर नजर असेल. तर फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. रोहितने गेल्या सामन्यात शतक ठोकलं होतं. तर शमीने पाच विकेट्स घेतल्या होत्या. बांगलादेशबद्दल बोलायचं झाल्यास जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या शाकिब अल हसनवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही ठिकाणी शाकिब अल हसन चोख कामगिरी बजावत आहे. याशिवाय लिटन दासही सामन्यात कमाल दाखवू शकतो.