२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपल्यानंतर, आता पराभवाला जबाबदार कोण यावरुन चर्चांना उधाण आलेलं आहे. बीसीसीआयने माजी पदाधिकारी, निवड समिती प्रमुथ यांनी, एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. निवड समितीने विश्वचषकासाठी चुकीचा संघ निवडला असा सूर उमटत आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं आम्हाला भोवलं – रवी शास्त्री

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची दाणादाण उडाली. पहिले ३ फलंदाज हे अवघ्या ५ धावांमध्ये माघारी परतले. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना धोनीसारख्या अनुभवी फलंदाजाने मैदानात येणं अपेक्षित होतं. मात्र व्यवस्थापनाने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतला बढती देत धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. धोनीला फलंदाजीसाठी उशीरा पाठवणं ही भारताची सर्वात मोठी चूक होती असं गांगुलीने म्हटलं आहे.

“महेंद्रसिंह धोनी दिनेश कार्तिकच्या जागेवर फलंदाजीसाठी येणं गरजेचं होतं. धोनी चौथ्या क्रमांकावर आला असता तर त्याने ऋषभ पंतला कसं खेळावं याचा सल्ला दिला असता. कार्तिक, पांड्या हे फलंदाज अखेरच्या फळीत जाडेजासोबत योग्य ठरले असते. प्रशिक्षक रवी शास्त्री त्यावेळी नेमका काय विचार करत होते मला माहिती नाही, मात्र ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली आहे.” सौरव गांगुलीने आपलं मत व्यक्त केलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : संघ निवडताना अक्कल गहाण ठेवली होतीत का?

धोनीने त्या सामन्यात फलंदाजीसाठी वरती येणं गरजेचं होतं. त्या क्षणी भारतीय डावाला आकार देण्याची गरज होती. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता तर त्याने विकेट पडू दिल्या नसत्या. ऋषभ पंत वाऱ्याच्या दिशेविरोधात फटका खेळून बाद झाला, धोनी त्याजागी असता तर त्याने ऋषभला असं करण्यापासून नक्की थांबवलं असतं. महत्वाच्या सामन्यात तुम्ही धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवू शकत नाही. धोनी Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे.