विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने भारतावर मात केली. या सामन्यात भारताच्या फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र यानंतर भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा संघाच्या भवितव्याबद्दल अजुनही सकारात्मक आहे. भारताचा संघ चांगला असून कर्णधार विराटच्या मदतीसाठी मी नेहमी तयार असल्याचं रोहितने म्हटलं आहे. तो टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“विराट कोहलीचा संघ आश्वासक आहे. कर्णधार म्हणून गेल्या काही वर्षात त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. ज्यावेळी त्याला माझी गरज असेल, त्यावेळी मी हजर आहे. संघाचं हित ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे.” रोहित शर्माने आपलं मत मांडलं. पहिल्या सामन्यात रोहित आणि विराटला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही.

अवश्य वाचा – अखेरच्या फळीतल्या खेळाडूंनीही फलंदाजीची जबाबदारी घ्यावी – विराट कोहली

कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने काही आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा कर्णधार म्हणून इतिहास चांगला आहे. नुकतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवलं आहे. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियावरचं संकट टळलं, विजय शंकरची दुखापत गंभीर नाही