राजधानी नवी दिल्लीत मे आणि जून महिन्यात दोन टप्प्यात होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली आहे. करोना विषाणूचा धोका वाढत चालला असून सर्वाच्या आरोग्याचे हित जपण्याच्या दृष्टीने सोमवारी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

विश्वचषक स्पर्धा १५ ते २६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवसआधी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रायफल आणि पिस्तूल प्रकाराची स्पर्धा ५ ते १३ मेदरम्यान आणि शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जूनदरम्यान होणार होती. ‘‘करोनामुळे रायफल-पिस्तूल तसेच शॉटगन विश्वचषक स्पर्धा संयोजकांना रद्द करावी लागली आहे. या दोन्ही स्पर्धा नवी दिल्लीत होणार होत्या,’’ असे जागतिक नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) म्हटले आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, ‘आयएसएसएफ’ आणि भारतीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा रद्द करण्यासाठी संयोजकांवर दबाब होता. ‘‘खेळाडू, पदाधिकारी, कर्मचारी तसेच आमच्या सर्व सदस्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे,’’ असे ‘एनआरएआय’कडून सांगण्यात आले.

‘आयएसएसएफ’ने बाकू, अझरबैजान येथे २२ जून ते ३ जुलैदरम्यान होणारी विश्वचषक स्पर्धाही रद्द केली आहे.