|| तुषार वैती

‘म्हारी छोरियाँ छोरो से कम हैं के’ हा ‘दंगल’ या चित्रपटातील प्रेरणादायी संवाद. पुरुषप्रधान संस्कृतीतही खेळासारख्या क्षेत्रात स्त्रिया कमी नाहीत, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न. महावीर फोगट आणि त्यांच्या गीता, बबिता, रितू आणि संगीता फोगट या कन्यांनी नंतर खऱ्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करत खेळाचे मैदान गाजवले. या चित्रपटानंतर फोगट बहिणी खऱ्या अर्थाने नावारूपाला आल्या. त्यांच्या कामगिरीने प्रेरित होऊन अनेक मुली खेळाकडे वळल्या. पण याच फोगट बहिणींची १७ वर्षीय मामेबहीण रितिका हिने एका स्पर्धेतील अपयशाने गळफास लावून आत्महत्या केल्याने नैराश्येचे लोण आता खेळातही शिरकाव करू लागले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गीता आणि बबिता यांच्यापासून प्रेरणा घेत रितिका हिनेही कुस्ती खेळायला सुरुवात केली. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या महावीर फोगट यांच्या अकादमीत अनेक वर्षांपासून प्रशिक्षणाचे धडे गिरवणारी रितिका कनिष्ठ आणि उपकनिष्ठ वयोगटात प्रतिनिधित्व करत होती. राजस्थानमधील एका कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत थोडय़ा फरकाने पराभूत व्हावे लागल्यानंतर रितिकाने आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. फोगट घराण्याची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी असताना रितिकाने आत्महत्या का केली, हे एक कोडेच म्हणावे लागेल.

एका अपयशाने तिने आयुष्य संपण्याचा निर्णय का घेतला, याची उत्तरे आता शोधावी लागतील. ‘‘आत्महत्या हे समाधान होऊ शकत नाही. हार-जीत हे जीवनाचे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत. अपयशी होणारा एके दिवशी नक्कीच जिंकतो. संघर्ष हाच यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. त्यामुळे संघर्षांला न घाबरता कुणीही अशाप्रकारचे पाऊल उचलू नये,’’ ही बबिता फोगटने दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.

खेळाडूला प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही. पण आपल्या मुलाने खेळामध्ये यश मिळवावे, यासाठी पालकांचा तगादा लागलेला असतो. पालक आणि प्रशिक्षकांच्या दडपणामुळे काही मुले सुरुवातीला अपयशाचा सामना करतात. पण अशा परिस्थितीत पालक आणि प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. कदाचित फोगट बहिणी आणि काकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे रितिकावर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली तर नसावी ना? खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे टाकणे कितपत योग्य आहे? याचा विचारही आता व्हायला हवा.

रितिकाच्या आत्महत्येच्या निमित्ताने नैराश्येचे हे लोण आता खेळातही पसरू लागले की काय, ही शंका उपस्थित होत आहे. मुळातच कामगिरी, दुखापती, मानसिक ताणतणावाचा सामना करताना आता खेळाडूंना येणाऱ्या नैराश्येबाबतही प्रशिक्षण देण्याची गरज भासू लागली आहे. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आता वेळीच योग्य पावले उचलण्याची गरज आहे. तरच भविष्यात देशाला चांगले खेळाडू मिळू शकतील.

” रितिकाने केलेली आत्महत्या ही फक्त एका खेळाडूपुरती मर्यादित राहिलेली नाही. करोनााप्रमाणेच एका संसर्गासारखा सर्व क्षेत्रात नैराश्येचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. मानसोपचार क्षेत्रात काम करताना खेळामध्ये नैराश्येचा शिरकाव झाला आहे, हे ऐकिवात नव्हते. त्यामुळे रितिकाच्या आत्महत्येनंतर मला धक्काच बसला. कधी यश तर कधी अपयश पदरी येते, हे खेळातून शिकायला मिळते. ताणतणावाचा निचरा करणारे खेळासारखे अन्य दुसरे माध्यम नाही. हरलो म्हणून रितिकाने टोकाचे पाऊल उचलले असे मला वाटत नाही. टोकाचे पाऊल एका क्षणात उचलले जात नाही. तिच्यातील ताणतणावाच्या खुणा नक्कीच दिसत असणार. हरणे हे फक्त निमित्तमात्र आहे. नैराश्येचा सामना कसा करायचा, याचं प्रशिक्षण आता क्रीडाक्षेत्रातही देण्याची आवश्यकता आहे. ‘सहभाग हा महत्त्वाचा’ या ऑलिम्पिकच्या ब्रिदवाक्यानुसार यश-अपयश पचवणे खेळाडूंनी शिकायला हवे. – डॉ. नीता ताटके, क्रीडा मानसतज्ज्ञ

tushar.vaity@expressindia.com