मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रायुडूच्या अचानक घेतलेल्या निवृत्तीनंतर क्रीडा विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आजी-माजी क्रिडापटूंनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीनेही ट्विट करत रायुडूच्या निवृत्तीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रायुडू अव्वल क्रिकेटपटू होता अशी बोलकी प्रतिक्रिया कोहलीने दिली आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने रायुडूला टॅग करत लिहलेय, ‘पुढील वाटचालीस तुला शुभेच्छा! तू अव्वल क्रिकेटपटू आहेस.’ विराट कोहलीच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनीही यात उडी घेतली आहे. रायुडू अव्वल क्रिकेटपटू आहे तर मयांक ऐवजी त्याला संघात का घेतला नाही ? असा सवाल एका नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अन्य एका नेटकऱ्यांनी विराट कोहलीवर टीका केली आहे. व्यक्ती बेशर्म असेल तर काहीही ट्विट करतो. असा खोचक टोला लगावला आहे. रायुडूला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी द्यायला हवी होती असे नेटकऱ्यांनी विराट कोहलीच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे.


बीसीसीआयला लिहलेल्या पत्रात काय म्हणाला रायुडू ?
माननीय महोदय, मी ही गोष्ट आपणास कळवू इच्छितो की मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मला खेळण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआय आणि हैदराबाद, बडोदा, आंध्र प्रदेश आणि विदर्भ या सर्व संघटनांचा मी आभारी आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचाही मी आभारी आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तीन कर्णधारांच्या हाताखाली मला खेळायला मिळालं, त्यांचाही मी ऋणी आहे. विराट कोहलीने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच विसरणार नाही. प्रत्येकवेळी क्रिकेटमधून मला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली. जाता जाता, या संपूर्ण काळात माझ्या पाठीमागे उभ्या राहणारा माझा परिवार आणि चाहत्यांचाही मी आभारी आहे. धन्यवाद,
आपला विनम्र,
अंबाती रायुडू

रायुडूची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –
एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रायुडूने नोव्हेंबर २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रायुडूने २००४ मध्ये भारतीय अंडर १९ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. रायुडूच्या नेतृत्वाखाली शिखर धवन, दिनेश कार्तिक, आरपी सिंह आणि सुरैश रैना सारख्ये दिग्गज खेळाडू खेळले आहेत. रायुडूने भारतीय संघाकडून ५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४७ च्या सरासरीने १६९४ धावा केल्या आहेत. रायुडूची सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद १२४ धावांची आहे. रायुडूने तीन शतके आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत. रायुडूला टी-२०मध्ये आपला प्रभाव दाखवता आला नाही. सहा टी-२० मध्ये रायुडूला फक्त ४२ धावा करता आल्या आहेत.

वाद आणि रायुडू –
छोट्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रायुडूने अनेक वेळा वादाचा सामाना केला आहे. २००७ मध्ये इंडियन क्रिकेट लीग (ICL)शी करार केल्यामुळे बीसीसीआयने रायुडूवर बंदी घातली होती. दोन वर्ष रायुडू क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर २००९ मध्ये माफी मागितल्यानंतर बीसीसीआयने खेळण्याची परवाणगी दिली होती. २००५ मध्ये रणजी सामन्यादरम्यान रायुडूने प्रतिस्पर्धी खेळाडूला मैदानावर मारण्याचा प्रयत्न केला होता. आंध्रा प्रदेशमध्ये सामना खेळताना अर्जुन यादव सोबत रायुडूचा वाद झाला होता. त्याला मारण्यासाठी रायुडूने स्टंप उपसला होता.