वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत यजमान विंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त झाल्याने कॅप्टनकुल धोनीला सामना पुर्ण खेळता आला नाही. सामन्यात दबाव असताना महेंद्रसिंग धोनी मैदानात नसल्यामुळे त्याची उणीव भासल्याचे विराट कोहलीने स्पष्ट केले. दोन्ही प्रबळ संघ असल्यामुळे सामनाही तितकाच रोमांचक झाला होता. अखेरीस वेस्ट इंडिज संघाने भारतावर एका विकेटने विजय मिळवला.
भारताच्या फलंदाजीवेळी महेंद्रसिंग धोनीला दुखापत झाल्याने धोनी क्षेत्ररक्षणावेळी खेळू शकला नाही. त्यामुळे या सामन्यासाठीची कर्णधारपदाची धुरा युवाफलंदाज विराट कोहलीच्या खांद्यावर देण्यात आली. “जेव्हा सामन्यात दबाव होता अशावेळी धोनीची उणीव भासली कारण, दबावात शांत राहून खेळण्यात त्याचा हातखंडा आहे.” असे विराट कोहलीने सामन्याच्या अखेरीस झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात म्हटले.