भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीचा तडाखेबाज खेळाडू युवराज सिंग याने सोमवारी निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १८ वर्ष आपला ठसा उमटवल्यानंतर अखेर त्याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. पण देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये मात्र युवराज सिंग अजूनही खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

युवराजने त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या निर्णयानंतर त्याची पत्नी हेजल कीच हिने एक खास पोस्ट टाकली. “…आणि या (निवृत्ती) बरोबरच एका युगाचा अंत झाला. तू स्वतःबद्दल अभिमान बाळगायला हवा. आता नव्या अध्यायाला सुरुवात करू या .. लव्ह यू”, अशा शब्दात हेजलने त्याला पाठिंबा दर्शवला.

 

View this post on Instagram

 

And, with that, its the end of an era. Be proud of yourself husband, now onto the next chapter…. love you @yuvisofficial

A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial) on

युवराजने आजच्या पत्रकार परिषदेत भावनांना वाट मोकळी करून दिली. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले. निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, असे युवराजने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

युवराजचे वडील हे अतिशय शिस्तीचे आहेत. त्यांनीच युवराजला क्रिकेटमध्ये येण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे युवराजच्या निवृत्तीबाबत त्यांचे मत काय? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. याबाबतही युवराजने दिलखुलास उत्तर दिले. युवराज म्हणाला की मी माझ्या वडिलांच्या साठी क्रिकेटमध्ये आलो. ते स्वतः उत्तम क्रिकेटर होते. पण त्यांनाकिर्केट विश्वचषक उंचावता आला नाही. त्यामुळे त्यांनी ते स्वप्न माझ्यात पाहिले. सुदैवाने त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करू शकलो. २००७ चा टी २० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक असे दोन विश्वचषक उंचावण्यात मी माझा मोलाचा वाटा उचलला असे मला वाटते, त्यामुळे माझ्या वडिलांना माझ्या या कारकिर्दीनंतरच्या निवृत्तीवर नक्कीच अभिमान वाटत आहे, असेही युवराजने सांगितले.

सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला, त्याप्रमाणे तुला शेवटचा सामना स्वतःच्या आवडत्या मैदानावर खेळावासा वाटला नाही का? किंवा तू BCCI ला या बाबतची विनंती केली नाहीस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना युवराज म्हणाला की मला अशा पद्धतीचे क्रिकेट आवडत नाही. मी कधीच कोणाकडे माझ्या निरोपाचा सामना खेळण्याचा हट्ट धरला नाही. मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला निरोपाचा सामना खेळायला मिळेल आणि त्यानंतर मला निवृत्त व्हावे लागेल, असे मला सांगण्यात आले होते. पण मला त्या पद्धतीचा निरोप कधीही नको होता. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितले की जर मी यो-यो टेस्ट पास झालो नाही, तर मला कोणीही इतर लोकं सांगण्याआधी मी स्वतःहून घरी निघून जाईन आणि निवृत्ती स्वीकारेन.