भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने १० जून २०१९ ला आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याने अलविदा म्हटले. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले. “निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबीयांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला”, असे युवराजने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पण आता तब्बल वर्षभरानंतर युवराजने BCCIवर टीका केली आहे.

कृणालची फिल्मी लव्हस्टोरी; मुंबई इंडियन्सच्या अख्ख्या टीमसमोर मध्यरात्री केलं प्रपोज

“एखाद्याला निरोप देणे कशा पद्धतीचे असावे याचा सामना खेळाडू करत नाही, BCCI करतं. मलादेखील निरोपाचा सामना खेळवणं हे BCCI च्या हातात होतं. पण माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मला BCCIने फार वाईट वागणूक दिली. या यादीत मी एकटाच नाही. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, जहीर खान यांच्याबाबतीतही फार काही वेगळं घडलं नाही. या साऱ्या दिग्गज खेळाडूंना BCCIने वाईट प्रकारे वागणूक देऊन त्यांचा अपमानच केला. पण भारतीय क्रिकेटमध्ये हे सवयीचं झालं आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत जेव्हा हे घडलं तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं नाही”, असे युवराज म्हणाला.

“जे खेळाडू भारतासाठी दीर्घ काळ खेळले आहेत; ज्यांनी भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत अशा खेळाडूंना भविष्यात तरी चांगली वागणूक मिळाली पाहिजे. गौतम गंभीरसारख्या दोन विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूला तसा आदर दिला जायला हवा होता. सुनील गावसकर यांच्यानंतर कसोटीत सेहवाग हा सर्वात मोठा मॅचविनर होता. जहीर खानने ३५० गडी घेतले होते. लक्ष्मणही उत्तम खेळाडू होता. अशा अनेक खेळाडूंना BCCIने वाईट वागणूक दिली. पण भविष्यात निवृत्त होणाऱ्या चांगल्या खेळाडूंना थोडा आदरपूर्वक निरोप द्यायला हवा”, असा सल्ला युवराजने दिला.