जर्मनीतील म्युनिक शहरात होणाऱ्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर २५ सदस्यीय भारतीय पथक दमदार कामगिरीसाठी सज्ज झाले आहे. १९ ते २६ मे या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले अभिनव बिंद्रा, जितू राय, गगन नारंग, चैन सिंग, अपूर्वी चंडेला, अयोनिका पॉल, गुरप्रीत सिंग, पी. एन. प्रकाश, हीना सिंधू यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या आधीच्या टप्प्यांमध्ये जितू रायने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला होता. विश्वचषकातील कामगिरीद्वारेच जितूने पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. ऑलिम्पिकमध्ये १२ भारतीय नेमबाज सहभागी होत आहेत. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारतीय नेमबाजांचे सगळ्यात मोठे पथक असणार आहे. अभिनव बिंद्राच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराची अंतिम फेरी शनिवारी होणार आहे.