Who is Impact Player of T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषकापूर्वीची रंगीत तालीम म्हणून टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. यादरम्यान एका कार्यक्रमात भारताचे माजी खेळाडू व कोच रवी शास्त्री व इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यांनी भारताच्या खेळाडूचं वर्ल्डकपमील लक्षवेधी खेळाडू म्हणून नाव घेतलं आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ १५ दिवसांवर आलेला असताना बांगलादेश क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्डकपमधून माघार घेतली आहे. भारतात संघाला स्पर्धेतील वर्ल्डकप सामने खेळायचे नसल्याने संघाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश व भारतात गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती होती. यानंतर बीसीसीआयने बांगलादेशचा खेळाडू मुस्ताफिजूर रहमान याला आयपीएलचा संघ केकेआरमधून रिलीज करण्यास सांगितलं, यानंतर बांगलादेशने भारतात टी-२० सामने खेळणार नसल्याने इतर ठिकाणी सामने व्हावेत, अशी विनंती केली. तर आयसीसीने नकार दिल्यानंतर अंतिम निर्णय देण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. यानंतर आता बांगलादेशने वर्ल्डकपमधून माघार घेतली आहे.
मॅरियट बोनव्हाय व इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल (आयसीसी) यांच्यामध्ये ग्लोबल पार्टनरशिप झाली आहे. यासंबंधित कार्यक्रमाला रवी शास्त्री व केविन पीटरसन हे एकत्र उपस्थित होते. यादरम्यान त्या दोघांनाही विचारण्यात आलं की यंदाच्या टी-२० विश्वचषकातील लक्षवेधी खेळाडू कोण असेल, यावर केविन पीटरसनने सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याचं नाव घेतलं आणि यानंतर त्याने भारताचा फलंदाज अभिषेक शर्माचं नाव घेतलं. तर रवी शास्त्री यांनीदेखील थेट अभिषेक शर्माचं नाव घेतलं.
रवी शास्त्री अभिषेक शर्माबद्दल बोलताना म्हणाले, या वर्ल्डकपमधील लक्षवेधी खेळाडू हा अभिषेक शर्मा असेल. जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-२० फलंदाज आहे. तो चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या सामन्यात त्याने त्याच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर न्यूझीलंडला सामन्यातून बाहेर केलं. तो लक्षवेधील खेळाडू असेल, कारण त्याचा कॉन्फिडन्स कमाल आहे. जर तो कमालीची इनिंग खेळला तर संघ मोठी धावसंख्या उभारणार हे निश्चित असतं.
अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यात उत्कृष्ट खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अभिषेक शर्माने ३५ चेंडूत ५ चौकार व ८ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा झेलबाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. अभिषेक शर्मा यादरम्यान २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक वेळेस अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने षटकारांमध्ये युवराज सिंगला मागे टाकलं आहे.
