भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी नियमित कर्णधार रोहित शर्मा कोविड १९ पॉझिटिव्ह झाला. त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर एखाद्या गोलंदाजाला भारतीय संघाची धुरा मिळाली. याबाबत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जसप्रीत बुमराहला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय धाडसी असल्याचे चॅपेल म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी भारताचे कौतुक केले आहे.

नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहुल प्रकृतीच्या कारणामुळे एजबस्टन कसोटी सामन्यात खेळू शकले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये २८ वर्षीय वेगवान गोलंदाज बुमराहकडे कर्णधारपद दिले गेले. कर्णधार झाल्यानंतर त्याने अधिक प्रभावी कामगिरी केल्याचे दिसत आहे. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा जमा करून विश्वविक्रम रचला. याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात बळी घेतले. इयान चॅपेल बुमराहच्या या कामगिरीमुळे फार प्रभावित झाले आहेत.

हेही वाचा – IND vs ENG Edgbaston Test : ‘ये रे ये रे पावसा…’, भारतीय चाहत्यांनी सुरू केली प्रार्थना

“ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या यशाचे अनुकरण करण्यासाठी भारताने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. हा अतिशय धाडसी निर्णय आहे. बुमराहने देखील चमकदार कामगिरी करून आपली योग्यता सिद्ध केली आहे. बुमराह आणि स्टोक्स दरम्यान नेतृत्वाची लढाई बघाने नक्कीच मनोरंजक ठरेल”, असे इयान चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोच्या स्तंभात लिहिले आहे.