शनिवारी (३० जुलै) झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या मालिकेत विराट कोहली खेळले, अशी चर्चा होती. मात्र, निवडलेल्या संघामध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर केव्हा पुनरागमन करणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. या दरम्यान, विराटने आपल्या पुनरागमनाबाबत स्वत: निवडसमितीशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत आहे. अशातच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी २० मालिका आणि वेस्ट इंडीज दौऱ्यात त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघातही त्याचे नाव नाही. त्यामुळे विराट कोहलीला जाणीवपूर्वक वगळल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीने स्वत: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सुट्टी मागितली आहे. त्यानंतर होणाऱ्या आशिया चषकापासून तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा – ‘फुल समझनेकी गलती ना करना!’ भारताच्या मुलींनी दाखवला वेटलिफ्टिंगमध्ये जोर

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कोहलीने त्याच्या पुनरागमनाबाबत निवडकर्त्यांशी संवाद साधला आहे. तो आशिया चषक स्पर्धेत परतणार असून त्यानंतर सातत्याने खेळणार असल्याचे सांगितले आहे. चाहत्यांना कोहलीच्या फॉर्मची चिंता आहे. चाहत्यांचे आणि काही क्रिकेट पंडितांचे असे मत आहे की, कोहलीने सतत खेळले पाहिजे. जेणेकरून तो आपला गमावलेला फॉर्म परत मिळवू शकेल.

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीशिवाय बुमराह, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. आशिया चषकापासून टी २० विश्वचषकापर्यंत भारताचे क्रिकेट व्यस्त वेळापत्रक असणार आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.