भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात सलामीवीर लोकेश राहुलला आलेलं अपयश हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रोहित शर्माला भारतीय संघात सलामीवीराची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. याचसोबत स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारे अभिमन्यू इश्वरन आणि शुभमन गिल यांच्या नावांचाही निवड समिती विचार करु शकते. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माला कसोटी संघात सलामीला संधी द्यावी यासाठी सौरव गांगुलीसह अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. या खेळाडूंच्या यादीत आता माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भर पडली आहे.

“रोहितला सलामीच्या जागेवर किंवा तिसऱ्या-चौथ्या जागेवर खेळायला मिळणं ही एक औपचारिकता आहे. रोहित जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याला कसोटी संघात सलामीची जागा मिळणं ही चांगली गोष्ट आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला एक हक्काची जागा आणि थोडा वेळ देणं गरजेचं आहे. विश्वचषकात ज्यावेळी गरज होती त्यावेळी रोहितने चांगला खेळ केला. रोहित तुम्हाला सामना जिंकवून देणारा खेळाडू आहे, कसोटीत तो नक्की यशस्वी होईल.” Mid-Day वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वेंगसरकर बोलत होते.

वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहितला संघात जागा न मिळाल्याबद्दलही वेंगसकरांनी नाराजी व्यक्त केली. “रोहितसारख्या खेळाडूला संघात जागा न मिळणं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. विंडीजऐवजी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसारखे प्रतिस्पर्धी समोर असते तरीही संघ व्यवस्थापनाने रोहितला संघाबाहेर बसवलं असतं? तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. विश्वचषकात पाच शतकं झळकावल्यानंतर रोहितला संधी नाकारणं हे अन्यायकारक आहे. त्याला संघात जागा का मिळाली नाही याचं कारणंही समजू शकलेलं नाही.” वेंगसरकरांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – ….तर रोहित विश्वचषकात पाच शतकं करुच शकला नसता – रवी शास्त्री