इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने दमदार कमबॅक करत १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारताने २-१ ने आघाडी घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावरून सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतानं सामन्यात केलेलं कमबॅकचं त्याने तोंडभरून कौतुक केलं आहे.

“प्रत्येक सेटबॅकनंतर भारतीय खेळाडूंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ ७७ वर बिनबाद होता. मात्र शेवटच्या दिवशी भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. अशीच कामगिरी करा. आता इंग्लंडला ३-१ पराभूत करा”, असं ट्वीट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केलं आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर उमेश यादवने ३ गडी बाद केले. आता कसोटी मालिकेतील पाचवा सामना अनिर्णित किंवा भारताने जिंकल्यास मालिका जिंकणार आहे. तर इंग्लंडपुढे आता फक्त मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे त्यांना पाचवा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.

ओव्हलवर भारताचा विजय

या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवला होता.