आयपीएल २०२१ स्पर्धेत प्लेऑफच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून पराभूत केलं. या विजयासह चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीने चेन्नईसमोर विजयसाठी १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान चेन्नईने ६ गडी गमवत १९ षटकं आणि ४ चेंडूत पूर्ण केलं. या विजयासह चेन्नईने आयपीएल इतिहासात नवव्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आतापर्यंत चेन्नईने आयपीएलचे ३ चषक आपल्या नावावर केले आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बॅट चांगलीच तळपली. धोनीने ३०० च्या स्ट्राईक रेटने म्हणजेच ६ चेंडूत १८ धावा केल्या. या खेळी ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात ३ चौकार ठोकत दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून मात दिली. मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला अंतिम फेरीत पोहोचवले. विशेष म्हणजे धोनीने त्याच्या स्टाईलमध्ये फिनिशिंग टच देत विजयी चौकार मारला. या कामगिरीनंतर चेन्नई संघांचं हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कुटुंबीयांनी शिट्ट्या आणि टाळ्यांसह संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. या जल्लोषाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सनं ट्विटरवर शेअर केला आहे. आयपीएलमधील चेन्नईचा आतापर्यंतचा प्रवास २००८- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत२०१०- चेन्नई सुपर किंग्स- विजयी२०११- चेन्नई सुपर किंग्स- विजयी२०१२- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत२०१३- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत२०१५- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत२०१८- चेन्नई सुपर किंग्स- विजयी२०१९- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत२०२१- अंतिम फेरीत असा रंगला सामना ऋतुराज गायकवाड, राॉबिन उथप्पा आणि कप्तान महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पाडाव करत आयपीएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुबईच्या मैदानावर प्रेक्षकांना रंगतदार सामना पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कप्तान ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे दिल्लीने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज -रॉबिनने ११० धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगल्या स्तरावर पोहोचवले, परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्तम मारा करत चेन्नईला संकटात टाकले होते. शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला २ चेंडू राखून विजय मिळवून दिला. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दिल्लीला अजून एक संधी मिळणार आहे.