कोइंबतूर येथे दुलीप करंडक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग यांच्यात हा सामना झाला होता. या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पश्चिम विभाग संघाने २९४ धावांनी दक्षिण विभागाचा पराभव केला आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात झालेल्या वादमुळे हा दिवस चर्चेत राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्यातून युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल या मैदानाच्या बाहेर काढलं.

पश्चिम विभागाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण विभाग संघ फलंदाजी करत होता. यावेळी रवी तेजा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात बाचाबाची झाली. यशस्वी जैस्वाल सतत स्लेजिंग करत असल्याने अंपायरने दोन वेळा त्याला इशारा दिला होता. मात्र, ५० व्या षटकात जैस्वाल आणि रवी तेजा यांच्या जोरदार वाद झाला.

तेव्हा तिथे असलेल्या अजिंक्य रहाणेने मध्यस्ती केली आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रहाणेने समजूत काढल्यानंतर काहीवेळ जैस्वाल शांत राहिला. मात्र, परत रवी तेजाकडे पाहून काहीतरी बोलत होता. त्यावेळी अंपायरने अजिंक्य रहाणेकडे त्याची तक्रार केली. मग रहाणेने नाईलाजास्तव यशस्वी जैस्वाल याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर ६५ व्या षटकात जयस्वालला क्षेत्ररक्षणासाठी बोलवण्यात आलं.

हेही वाचा – अजिंक्य रहाणेच्या संघाने रचला इतिहास, १९व्यांदा कोरले दुलीप करंडकावर नाव

जैस्वालने ठोकली दोन शतके

दरम्यान, दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग यांच्यात हा सामना रंगला होता. या सामन्यात पश्चिम विभागाने ५२९ धावांचे आव्हान समोर ठेवले होते. मात्र, दक्षिण विभाग २३४ धावांवरच सर्वबाद झाला. पश्चिम विभागाने हा सामना २९४ धावांनी जिंकला. या सामन्यात यशस्वी जैयस्वालने दोन शतके ठोकली. यशस्वीने ३२३ चेंडूत २६४ धावा केल्या, ज्यात ३० चौकार ४ षटकारांचा समावेश आहे.