भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावरुन यू-टर्न घेतला आहे. २०१९ विश्वचषक संघात अंबाती रायुडूची भारतीय संघात निवड झाली नाही. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर शिखर धवन आणि विजय शंकर हे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले, मात्र त्यानंतरही निवड समितीने अंबाती रायुडूकडे दुर्लक्ष केलं. यानंतर नाराज झालेल्या रायुडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारण्याचा निर्णय घेतला. ३ जुलैरोजी रायुडूने आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली होती. मात्र काही महिन्यांनंतरच रायुडूने आपला निवृत्तीच्या निर्णय मागे घेतला आहे. आयपीएलमध्ये आपण खेळत राहणार असून, भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासही आपण तयार असल्याचं रायुडूने म्हटलंय.

Sportsstar या इंग्रजी संकेतस्थळाशी बोलत असताना रायुडू म्हणाला,”मी चेन्नईच्या संघाकडून आयपीएलमध्ये नक्की खेळणार आहे. याचसोबत मर्यादीत षटकांसाठीच्या भारतीय संघातही मी लवकरच पुनरागमन करेन. सध्या मी शाररिक तंदुरुस्तीवर भर देतो आहे. चेन्नईचा संघ हा मला नेहमी आपल्या घरच्यासारखा वाटतो.” सुरुवातीचे काही हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळणारा अंबाती रायुडू गेली काही दोन वर्ष चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो आहे. त्यामुळे अंबाती रायुडू आपलं पुनरागमन नेमकं कधी करतोय याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL : रविचंद्रन आश्विनचं स्थान धोक्यात? पंजाब नवीन कर्णधाराच्या शोधात