खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई

नक्षलवादाचे रडगाणे गात वाटचाल..
राज्यातील एकमेव नक्षलग्रस्त लोकसभा मतदारसंघ, अशी गडचिरोली-चिमूर मतदारसंघाची ओळख देता येईल. विकास कामात अडथळे निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे अस्तित्व हीच या मतदारसंघाची प्रमुख समस्या आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक अविकसित असलेल्या या मतदारसंघात योजना राबवतांना प्रशासकीय यंत्रणेसोबतच लोकप्रतिनिधींनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्याचे खासदार मारोतराव कोवासेही त्याला अपवाद नाहीत. गेल्या वेळी विदर्भात निर्माण झालेल्या अनुकूल फायद्यामुळे कोवासे निवडून आले होते. यंदा मात्र परिस्थिती तेवढी चांगली नाही. काँग्रेसचे स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांची नाराजी कोवासे यांना त्रासदायक ठरू शकते. गडचिरोली परिसरात राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिताच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली. या साऱ्या बाबी काँग्रेससाठी अडचणी वाढविणाऱ्या आहेत. मात्र आदिवासींमध्ये काँग्रेसबद्दल असलेली आपुलकी फायदेशीर ठरेल, असे काँग्रेसचे गणित आहे. कोवासे यांच्याबद्दलची नाराजी, पक्षांतर्गत गटबाजी हे सारे आपल्या पथ्थ्यावर पडेल, असे भाजपचे गणित आहे. विदर्भातून यंदा जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांचा प्रयत्न आहे. गडचिरोलीसाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची शासनाने केलेली घोषणा सत्ताधारी पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.
लोकसभा मतदारसंघ : गडचिरोली-चिमूर
विद्यमान खासदार : मारोतराव कोवासे (काँग्रेस)
मागील निकाल :  अशोक नेते (भाजप पराभूत)
जनसंपर्क
कोवासे यांचे गडचिरोलीत जनसंपर्क कार्यालय आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या फिरण्यावर र्निबध आले असले, तरी दूरध्वनीच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात असतात.
मतदारसंघातील कामगिरी :
*देवरी-गडचिरोली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग होण्यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात.
*कारवाफा व चेन्ना सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सतत चार वष्रे प्रयत्न.
*गोदावरी व इंद्रावती नदीवरील ३०० कोटीच्या दोन मोठय़ा पुलांसाठी प्रयत्नशील.
*तेंदू व बांबू विक्रीची कामे जंगल सहकारी संस्थांमार्फत करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात.
*गोंडवाना विद्यापीठात कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांसाठी पाठपुरावा.
लोकसभेतील कामगिरी
उपस्थित केलेले एकूण प्रश्न ४६३, तारांकित ३८, अतारांकित ४२५,३४ वेळा चर्चेत सहभाग, एकूण हजेरी २९३ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेतील कामगिरी
*देशातील आदिवासीबहुल भागात युवकांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण कार्यक्रम आखणे
*वडसा आणि आमगाव रेल्वे स्टेशनवर पादचारी पूलाची गरज
*गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता
*गडचिरोली जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालयाची मान्यता हवी
*गडचिरोली-चिमूर मतदार संघातील मरकडेय देवस्थानचा विकास करण्याची गरज
खनिजाधारित उद्योगांसाठी पाठपुरावा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वर गोदावरी, तसेच इंद्रावती नदीवर बांधण्यात येत असलेले दोन मोठे पूल या भागाचे चित्र बदलवून टाकतील. देवरी-गडचिरोली-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग घोषित होण्यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. आंध्रमध्ये होत असलेल्या चेवेल्ला धरणामुळे या जिल्ह्य़ातील गावे बुडणार असल्याने हे धरणच होऊ नये, यासाठी पाठपुरावा केला. गोंडवाना विद्यापीठात आदिवासी तरुणांचे कौशल्य विकसित होईल, असे अभ्यासक्रम सुरू करण्यात लवकरच यश मिळेल. जिल्ह्य़ात खनिजाधारित उद्योग सुरू व्हावेत, अशी मागणी केंद्राकडे लावून धरली आहे.                    
मारोतराव कोवासे

निष्क्रीय खासदार
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कोवासे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. रेल्वेच्या संसदीय समितीवर असूनही ते साधे सर्वेक्षणाचे काम मार्गी लावू शकले नाहीत. या भागातले २२ सिंचन प्रकल्प वनकायद्यामुळे अडकले आहेत.  नक्षलवादामुळे संपर्क ठेवण्यात अनेक अडचणी येतात, हे मान्य असले तरी आमदार असतांना आपणही सुरक्षेची काळजी घेऊन फिरत होतोच. कोवासे तेही करीत नाहीत. हा मतदारसंघ मागास आहे. त्यात निष्क्रीय खासदाराचा वाटा मोठा आहे.
अशोक नेते, भाजप

संकलन : देवेंद्र गावंडे