येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणारी ही स्पर्धा यावेळी टी २० स्वरुपात खेळवली जाणार आहे. १९८४मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४ पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळली गेली होती. परंतु २०१६ मध्ये टी २०विश्वचषकामुळे या स्पर्धेच्या स्वरुपात बदल करण्यात आले. तेव्हापासून टी २० फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला. मात्र, २०१८मध्ये आशिया चषकातील सामने पुन्हा ५० षटकांचे करण्यात आले होते. क्रिकेटची प्रचंड लोकप्रियता असलेल्या आशिया खंडामध्ये ‘आशिया चषक’ स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेबाबत अशा अनेक रंजक गोष्टी आहेत ज्या अनेक चाहत्यांना माहिती नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) पहिला आशिया चषक १९८४ मध्ये यूएईतील शारजाह येथे झाला होता. नव्याने स्थापन झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेने आयोजित केली होती. त्यावेळी या स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या तीनच देशांनी भाग घेतला होता. त्याची सुरुवात ‘राऊंड-रॉबिन’ स्पर्धा म्हणून झाली होती. ज्यामध्ये सर्वाधिक विजय मिळविलेल्या राष्ट्राला विजेता घोषित करण्यात आले. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवले होते.

हेही वाचा – Asia Cup 2022: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; विराट कोहली अन् केएल राहुलचे पुनरागमन तर दुखापतग्रस्त बुमराह बाहेर

२) आशिया चषकातील ५०षटकांच्या सामन्यांमध्ये एकही भारतीय फलंदाज आतापर्यंत शून्यावर बाद झालेला नाही. श्रीलंकचे १७, बांगलादेशचे ११ आणि पाकिस्तानचे नऊ फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत.

३) यजमान देशासोबतच्या ताणलेल्या क्रिकेट संबंधांमुळे भारताने १९८६ मध्ये श्रीलंकेत झालेल्या आशिया चषकात सहभाग घेतला नव्हता.

४) आशिया चषक स्पर्धेत भारताच्या नावे फक्त एकच ‘फाइव्ह विकेट हॉल’ची नोंद आहे. १९८८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ढाका येथे झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाज अर्शद अयुबने ही कामगिरी केली होती.

५) १९९० मध्ये राजकीय तणावामुळे पाकिस्तानने भारतात आयोजित केलेल्या आशिया चषकातून माघार घेतली होती.

६) १९९३मध्ये भारत-पाकिस्तान राजकीय संबंधांतील तणावामुळे संपूर्ण स्पर्धाच रद्द करण्यात आली होती.

७) २००४ मध्ये आशिया चषकाच्या स्वरूपामध्ये बदल झाला. हाँगकाँग आणि यूएई ही दोन राष्ट्रे प्रथमच आशिया चषक खेळली. त्यामुळे स्पर्धेची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली होती. त्यावर्षी श्रीलंकेने भारताचा पराभव करून चषक जिंकला होता.

हेही वाचा – डेव्हिड वॉर्नर झाला पीव्ही सिंधूचा ‘फॅन’; खास पोस्ट करून म्हणाला…

८) २००८ मध्ये भारताने आशिया चषकासाठी प्रदीर्घ काळानंतर पाकिस्तानचा दौरा केला आणि अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अजंथा मेंडिसच्या मदतीने श्रीलंकेने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला.

९) आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी स्ट्राईक रेट नोंदवण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने २०१०मध्ये ही कामगिरी केली होती.

१०) २०१२ च्या आशिया चषकामध्ये विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोच्च १८३ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ३३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.

११) २०१४ मध्ये अफगाणिस्तान प्रथमच आशिया चषक स्पर्धेत उतरला होता. ढाका येथे झालेल्या या स्पर्धेत श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 here are the interesting facts about the historical asia cup tournament vkk
First published on: 10-08-2022 at 13:13 IST