यजमान भारताचा रविवारी महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत चायनीज तैपेईशी सामना होणार असून पहिला सामन्यातील बरोबरीनंतर त्यांना विजय अनिवार्य आहे. शुक्रवारी सलामीला भारताला इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले, तर दुसरीकडे तैपेईवर आठ वेळा विजेत्या चीनने ०-४ अशी मात केली. त्यामुळे रविवारच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास भारताला ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश लाभेल. तैपेईवरील विजयासह भारतीय संघाचे बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. इराणविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत भारताला गोल करण्याच्या बऱ्याच संधी लाभल्या; पण त्याचा फायदा करून घेण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे आक्रमणात सुधारणा गरजेचे असल्याचे सामन्यानंतर भारताचे प्रशिक्षक थॉमस डेनेर्बी म्हणाले. तैपेईविरुद्धच्या लढतीतही भारताचा आक्रमणावर भर अपेक्षित असून गोलसाठी त्यांची २० वर्षीय मनीषा कल्याणवर भिस्त आहे. ’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : युरो स्पोर्ट्स