मस्कत : गतविजेत्या भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात करताना सलामीच्या लढतीत मलेशियाचा ९-० असा धुव्वा उडवला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथे स्थान पटकावण्याच्या विक्रमी कामगिरीनंतर प्रथमच मैदानात उतरणाऱ्या भारतीय महिला संघाने या सामन्यात आक्रमक शैलीत खेळ केला. त्यांनी पूर्वार्धात चार आणि उत्तरार्धात पाच गोलची नोंद केली. भारताकडून वंदना कटारिया (८ आणि ३४वे मिनिट), नवनीत कौर (१५ आणि २७वे मि.), शर्मिला (४६ आणि ५९वे मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर दीप ग्रेस एक्का (१०वे मि.), लालरेमसिआमी (३८वे मि.) आणि मोनिका (४०वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. गोलरक्षक सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. भारताचे चांगली कामगिरी सुरू राखण्याचे लक्ष्य असून रविवारी त्यांचा जपानविरुद्ध दुसरा साखळी सामना होणार आहे.