आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. या लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत २३ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानी खेळाडूंचा उडालेला गोंधळ चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

हेही वाचा >>> PAK vs SL Asia Cup 2022 : हे काय? पाकिस्तानी खेळाडूने केले चिटिंग? मैदानातच पंचासोबत…

सामना सुरू असताना नेमकं काय घडलं?

नाणेफक जिंकून पाकिस्तानने सुरुवातीला गोलंदाजी करण्यााचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाकिस्तानी संघ श्रीलंकेला रोखण्यास काही प्रमाणात यशस्वी ठरला. मात्र शेवटच्या काही षटकांत श्रीलंकेने मोठे फटके लगावले. १९ वे षटक सुरू असताना श्रीलंकेच्या १४९ धावा झाल्या होत्या. यावेळी श्रीलंकेकडून भानुका राजपक्षे आणि करुणारत्ने हे फलंदाजी करत होते. याच षटकादरम्यान पाकिस्तानचे खेळाडू आसिफ आली आणि शादाब खान यांच्यात मोठा गोंधळ उडाला. श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेने मारलेल्या फटक्यानंतर झेल टिपताना हे दोन्ही खेळाडू एमकेकांना जोरात धडकले. पाकिस्तानसाठी राजपक्षे हा फलंदाज बाद होणे गरजेचे होते. मात्र झेल टिपताना उडालेल्या गोंधळामुळे त्याला जीवदान मिळाले. यामध्ये आसिफ अली आणि शादाब खान हे दोघेही काही प्रमाणात जखमी झाले.

हेही वाचा >>>आशिया चषकातून भारत बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा काय करतोय? दुबईतील पंचतारांकित हॉटेलमधील फोटो आला समोर

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने गोलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली. मात्र हा संघ फलंदाजीमध्ये आपली कमाल दाखवू शकला नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांचा निभाव लागला नाही. पाकिस्तानचे बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान यांच्यासारखे दिग्गज फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले. पाकिस्तानी संघ २० षटकातं फक्त १४७ धावा करू शकला. तर श्रीलंकेने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर आशिय चषकावर आपलं नाव कोरलं.